
रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील त्रुटी तात्काळ दूर कराव्यात माजी खासदार निलेश राणे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
रत्नागिरी-
कोरोनाच्या संकट काळात वैद्यकीय कर्मचारी वर्ग आपला जीव धोक्यात घालून कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक आहेच. परंतु काही ठिकाणी सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य यंत्रणेबाबत समस्या आहेत. त्या तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्या तात्काळ सोडवणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत भाजपचे नेते, महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले आहे.
पत्राद्वारे निलेश राणे म्हणाले की, जिल्हा रुग्णालयाकडून पीआरओची स्वतंत्र नेमणूक केली जावी. रुग्णालयातील कंट्रोल रूममधून रुग्णांच्या नातेवाईकांना आवश्यक ती माहिती योग्य प्रकारे दिली जात नाही. त्यामुळे नातेवाइकांची धावपळ होत आहे. ही नेमणूक झाल्यास नातेवाईकांना योग्य माहिती मिळू शकेल. अनेकदा रुग्णवाहिका वेळेत मिळत नाही आणि मिळाल्यास मोठ्या प्रमाणात शुल्क लावले जाते. त्यावर आपले व जिल्हा शल्य चिकित्सक यांचे नियंत्रण असायला हवे. याचबरोबर महिला रुग्णालयात आवश्यक त्या प्रमाणात पाण्याची सोय नाही. तसेच महिला रुग्णालयात वॉर्डबॉय, महिला शिपाईची पदांची संख्या वाढवून ती भरावीत. रुग्णालयात स्वच्छता राहण्याकरिता कचरा उचलण्यासाठी रोज गाडीची व्यवस्था करावी. रुग्णांना बेडची गरज असताना त्यांना प्रतीक्षेत ठेवले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. १००/१०८ चा नंबर लागत नाही आणि लागला तर कॉल देखील उचलला जात नाही. याबाबत संबंधित यंत्रणेला सक्त ताकीद द्यावी असे त्यांनी सांगितले.
राणे पुढे म्हणाले की, सपोर्टिंग ऑक्सिजनची उपलब्धता गरजेपेक्षा कमी आहे.ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांचे ऑक्सिजन मशीन मधील पाणी बदलणेकरिता व्यवस्था करावी. खानावळीची व्यवस्था ही अतिशय गरजेची असून ती २४ तास उपलब्ध करून द्यावी. या सर्वांसाठी फॉलोअपसाठी पिआरओची नेमणूक करावी. सिटी स्कॅन, ब्लड रिपोर्ट या प्रकिया लवकर होणे गरजेचे आहे. ग्रास रूट म्हणजेच फिल्ड वर काम करणाऱ्या डॉक्टर अथवा त्या त्या स्तरावरील कर्मचारी, अधिकारी यांची मिटिंग होणे अत्यंत गरजेचे आहे. स्टाफ चे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. डॉक्टर पुर्ण वेळ तसेच नियमित बसत नाहीत त्याबाबत त्यांना समज द्यावी. आरटीपीसीआर रोज लावण्यात यावे. पेशंटचे वेळोवेळी चेकिंग होणे आवश्यक आहे ते करावे. ग्रामीण भागात कोविड सेंटर होण्याबाबत केवळ घोषणा झाल्या आहेत. मात्र प्रत्यक्षात अजून कोविड सेंटर झाले नाही आहेत किंवा सदर बाबतीत अद्यादेश देखील निघाला नाही आहे. तो लवकरात लवकर काढण्यात यावा. ग्रामीण भागात टेस्ट वाढवल्या पाहिजेत. जिल्ह्याची वेबसाईट अपडेट नाही ती अपडेट करण्यात यावी. वरील सर्व समस्या या अतिशय गंभीर असून त्यांचे निराकरण योग्य त्या पद्धतीने लवकरात लवकर करण्यात यावे जणेकरून रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळेल असे त्यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
www.konkantoday.com