
एका सामाजिक कार्यकर्त्यांचे जिल्हाधिकार्याना नम्र आवाहन,कोरोना पॉझिटिव रुग्णांची फरफट थांबवा
मा. जिल्हाधिकारी साहेब,
सविनय नमस्कार.
आपल्या” माझी रत्नागिरी माझी जबाबदारी” मोहिमेचे सहर्ष स्वागत! पण या मोहिमेतून निष्पन्न होणारे पॉझिटिव्ह रुग्ण ठेवायचे कुठे? यांच्यावर उपचार करायचे कुठे? कृपया याचा आढावा घ्या. महिला जिल्हा रुग्णालय (कोविड हाॅस्पिटल) येथे रुग्ण आल्यानंतर तेथील व्यवस्थापनाला कुठल्या कोविंड केअर सेंटरला किती बेड शिल्लक आहेत याची माहिती नसते. विविध गावांमधून आलेले रुग्ण दिवस दिवस तेथे बसून असतात. त्यानंतर जसे बेड रिकामे होतील तशी थोडी थोडी त्यांची व्यवस्था केली जाते. तो रुग्ण दिवसभर भितीने अर्धमेला झालेला असतो. त्यानंतर कोविड केअर सेंटरला एखादा रुग्ण पाठवला तर त्या सेंटरच्या परिचारिकांना किंवा जे काही व्यवस्थापन आहे ते सेंटरवर जागा नसल्याचे कळवतात. यानंतर ते रुग्ण परत दुसऱ्या सेंटरवर पाठवतात यात रुग्णांची परवड होते हा अनुभव गेले आठ दिवस मी स्वतः अनुभवत आहे. कित्येक रुग्ण ऑक्सिजन लावून इतर उपचाराविना दिवस दिवसभर तेथे पडून असतात. तेथील डॉक्टरांचा व्यवस्थापनाचा ही नाईलाज आहे. बेड शिल्लक नसतील तर ते लोक काय करतील? होम आयसोलेशन साठी डॉक्टरांच्या सर्टिफिकेट ची असलेली अट रद्द करून आपण जर त्याच्या औषध देऊन रुग्णांना त्यांच्या घरी विलगीकरणकरता पाठवलेत तर आपल्यावरचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. तसेच rt-pcr टेस्ट करताना हातखंबा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुद्धा त्याच प्रकारे परवड होत आहे. ऑनलाइन रजिस्ट्रेशन जाऊन करावे लागत असल्याने व तेथील ओपीडीचा भार सांभाळत काम करावयाचे असल्याने तेथे रुग्णाला चार ते सहा तास थांबणे भाग पडत आहे.
गेले आठ दिवस माझ्या मालकीच्या वाहनाने कुणाकडूनही कुठल्याही प्रकारचे पैसे न आकरता सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मी रुग्णांना प्रथम मिरजोळे गाव ते हातखंबा व निष्पन्न झाल्यानंतर मिरजोळे ते जिल्हा महिला रुग्णालय येथे नेत असल्याने या सर्व कारभाराचा अनूभव घेत आहे. आज महिला जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी सहा वाजता घेऊन गेलेल्या दोन महिला व दोन लहान मुले यांना रात्री दहा वाजता गोगटे कॉलेज येथे पेपर देऊन पाठवल्यानंतर तेथे बेड उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. नंतर आपल्या इतर अधिकाऱ्यांना विनंती करून परत आंबेडकर भवन येते रात्री अकरा वाजता ऍडमिट करून हुं पाच तासांनी मी माझ्या घरी परत आलो आहे. तरी या सर्व अडचणींवर योग्य उपाययोजना करून नंतर आपण आपली मोहीम राबवली तर उत्तम प्रकारे फत्ते होईल अशी आशा वाटते.
माझ्यासारख्या सामान्य माणसाला आपणापर्यंत पोहोचून सदरचे मी निवेदन देणे शक्य नसल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचावे हा खटाटोप.
तसदीबद्दल क्षमस्व!
संजीव विचारे मिरजोळे रत्नागिरी.
www.konkantoday.com