
सागरी सुरक्षा रक्षक वेतनाअभावी वा-यावरः, समविचारी मंचने लक्ष वेधले
रत्नागिरीः कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखाली काम करणाऱ्या सागरी सुरक्षा रक्षकांना एप्रिल २०२०पासून वेतन मिळालेले नाही.हे अन्यायकारक असून या उमेदवारांना त्वरीत वेतन अदा करा अशी मागणी समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारींकडे करण्यात आली आहे.
समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,राज्य महासचिव श्रीनिवास दळवी,जिल्हाध्यक्ष रघुनंदन भडेकर,युवा अध्यक्ष निलेश आखाडे,महिला तालुकाध्यक्ष साधना भावे आदींनी ही मागणी केली.
रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ७३ युवक या पदावर कार्यरत आहेत.सेवेच्या प्रारंभापासून त्यांना कधीही वेतन वेळेवर मिळालेले नाही.एक वर्षापूर्वी अशीच स्थिती झाली असता त्यांच्यासाठी समविचारींनी धाव घेऊन प्रलंबित वेतन मिळवून दिले होते.यावेळीही या उमेदवारांनी विश्वासाने समविचारीकडे धाव घेतली.त्याला अनुसरून याप्रश्नी त्वरित हालचाल करण्यात आली आहे.
उन-वारा-वादळ-पाऊस असताना राबणा-या सुरक्षा रक्षकांना कोणीही वाली नाही.शरीराच्या सरंक्षणासाठी आवश्यक साधने पुरविण्यात येत नाहीत.लोकप्रतिनिधींना भेटून लक्ष देत नाहीत.अशा तक्रारी या उमेदवारांनी केल्या.
कामगार आयुक्त कार्यालयात जबाबदार अधिकारी नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात ही बाब मांडण्यात आल्याचे समविचारी मंचच्या वतीने सांगण्यात आले. त्वरित वेतन अदा न झाल्यास सनदशील मार्गाने निर्णय घेण्याचा इशारा संजय पुनसकर यांनी दिला आहे.
www.konkantoday.com