
परशुराम घाटात पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी बसवण्याच्या कामाला सुरुवात.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली कित्येक वर्षे सुरू आहे. विविध टप्प्यात काही कामे रखडली आहेत. त्यात परशुराम घाटातील धोकादायक स्थिती कायम चर्चेत राहिली आहे. या घाटात एका बाजूला २२ मीटर उंचीच्या दरडीचा भाग असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात नियमित दुर्घटना घडत आहेत. प्रामुख्याने गेल्या दोन महिन्यात वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे, तर दुसऱ्या बाजूला भरावाच्या ठिकाणी रस्ता व संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यासाठी दरडीच्या भागात लोखंडी जाळीच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत.
त्यासाठी जागोजागी खडकात व दरडीच्या भागात आठ ड्रील मशिनच्या माध्यमातून लोखंडी सळ्या घुसवल्या जात आहेत आणि त्यावर जाळी बसवली जात आहे.दोन महिन्यांपूर्वी परशुराम घाटात कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबीयनवॉल उभारण्याचे कामदेखिल सुरू केले आहे. सुरुवातीला सिमेंट काँक्रिटीकरणाचा पाया तयार करून त्यावर जाळीच्या सहाय्याने दगडी बांधकामाची रचना केली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत लोखंडी जाळीचे काम केले जात आहे.