
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबारमध्ये दिव्यांग्यांच्या समस्यांना मिळाला न्याय!
सामान्य नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी जनता दरबार चालू केला आहे. हा जनता दरबार दर बुधवारी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान शिवसेना राज्य संपर्क कार्यालय ‘शिवालय’ येथे आयोजित केला जातो.
दिनांक १६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता जनता दरबारमध्ये अंध विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळ आपल्या अडचणी घेऊन श्री.सामंत यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या होणाऱ्या परीक्षांबाबत त्यांच्या अडचणी सांगितल्या. यामध्ये दिव्यांग व्यक्तींना लेखनीक उपलब्ध नसणे, परीक्षापद्धती बद्दल संभ्रम, प्रवासाच्या अडचणी, त्यांच्या समस्यांची कोणीही दखल घेत नाही इ. विषय त्यांनी श्री. यांच्यासमोर मांडले. श्री. सामंत यांनी या बाबींची गंभीर दखल घेत या विषयासंबंधी राज्यातील सर्व कुलगुरूंची तत्काळ बैठक बोलावली. विशेषतः या बैठकीत अंध विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सहभागी करीत त्यांच्या समस्यांची सोडवणूक करून सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांना न्याय दिला.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांना अत्यंत तातडीने सोडविल्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. त्यांच्याकडून आम्हाला अत्यंत सन्मानाची वागणूक मिळाली. त्यांनी आमच्या सर्व अडचणी समजून घेत आम्हाला भविष्यातही लागेल ते सहाय्य करण्याचे आश्वस्त केले आहे. अशी भावना अंध विद्यार्थी संघटनेच्या ज्ञानेश्वर आहेरकर व गणेश साखळे यांनी यावेळी व्यक्ती केली.
आज मंत्रालयात झुमच्या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी श्री. सामंत यांनी राज्यातील प्रत्येक विद्यापीठात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी एक नोडल अधिकारी नेमावा, अशा सूचना यावेळी दिल्या. या माध्यमातून दिव्यांग विद्यार्थांच्या अडचणी तत्काळ मार्गी लागून त्यांना न्याय मिळेल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत दिव्यांग विद्यार्थ्यांना केवळ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनीच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अशी माहिती अंध विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने श्री. सामंत यांना दिली. याची तत्काळ दखल घेऊन त्यांनी सर्व कुलगुरूंना दिव्यांग विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर झालेल्या बैठकीत दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठांकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, अशी भावना सर्व कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केली. दिव्यांग विद्यार्थ्यांना एन.एस.एस च्या मदतीने लेखनीक उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासनही कुलगुरूंनी यावेळी दिले.
या बैठकीमध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक अभय वाघ, सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि संबंधित अधिकारी सहभागी होते.
www.konkantoday.com