लांजा-कोर्लेेतील सातवर्षीय बालिकेची आत्महत्या नव्हे तर खून; आई-वडिलांसह आठजणांना अटक

लांजा : तालुक्यातील कोर्ले येथील सातवर्षीय बालिकेच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असताना या प्रकरणाने वेगळीच कलाटणी घेतली आहे. पतीने केलेले दुसरे लग्न टिकावे आणि उघडकीस येऊ नये यासाठीच मुलगी आर्याचा खून करण्यात आला असल्याची फिर्याद आर्याची आई माया चव्हाण हिने लांजा पोलिस ठाण्यात दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे आर्याचे वडील, आजी आणि सावत्र आईसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. आर्या राजेश चव्हाण असे या बालिकेचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली पत्नी हयात असताना दुसरे लग्न केले म्हणून गुन्हा दाखल होईल या भीतीने आर्याचा खून करण्यात आल्याचे या फिर्यादीत तिची आई माया चव्हाण हिने म्हटले आहे. मालिका बघून केलेली आत्महत्या हा केवळ बनाव असल्याचे पुढे आले आहे. आर्याच्या मोठ्या बहिणीने  आजीच्या दबावापोटी आत्महत्या केल्याचा खोटा जबाब दिल्याचे या फिर्यादीत मांडण्यात आले आहे. लांजा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून आर्याची आजी सुनंदा सुभाष चव्हाण, वडील राजेश सुभाष चव्हाण, सावत्र आई काजल राजेश चव्हाण, चुलत आते अनिता नागेश चांदेकर, आजोबा सुभाष नारायण चव्हाण, काका दीपक सुभाष चव्हाण, सुरज सुभाष चव्हाण (सर्व राहणार कोर्ले सहकारवाडी, ता. लांजा) आणि सर्जेराव नारायण मोहिते (राजापूर) या आठजणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
ही घटना 11 जूनला घडली होती. हे कुटुंब सातार्‍याहून कोर्ले येथे राहण्यास आले आहे. वडील राजेश चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या घटनेचा संशय आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले होते. अखेर मयत बालिकेची आई माया राजेश चव्हाण (वय 34 रा. वडगाव पो. बीबी, ता. फलटण, जि. सातारा) हिने शनिवारी रात्री याप्रकरणी लांजा येथे फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, माझा पती राजेश चव्हाण याने केलेले दुसरे लग्न टिकावे या हेतूने हा गुन्हा घडला आहे. कुटुंबातील सर्वांनी मिळून माझ्या मुलीची ही हत्या केली असल्याची तक्रार त्यांनी नोंदविली आहे.  तक्रारीनुसार माया यांचे 2005 साली राजेशसोबत लग्न झाले असून राजेश चव्हाण याला दारूचे व्यसन असल्याने तो दारू पिऊन येऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ व मारहाण करीत असे. या मुदतीत फिर्यादी माया यांना तीन मुली झाल्या. तरीही पतीचे दारू पिऊन पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना शिवीगाळ करणे, मुलींना मारणे हा त्रास सुरुच होता. यामुळे फिर्यादी माया यांनी आपल्या तीन मुलींना घेऊन लांजातील कोर्ले गावातून आपल्या माहेरी वडगाव ता. फलटण जि. सातारा येथे निघून गेल्या होत्या.
पत्नी माहेरी गेल्यानंतर पती राजेश चव्हाण याने काजल हिच्याशी दुसरे लग्न केले. लग्नानंतर दुसरी पत्नी गरोदर राहिली. यातून आपण दुसरे लग्न केल्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल होईल, या भीतीपोटी राजेश चव्हाण यांनी पहिल्या पत्नीशी म्हणजेच फिर्यादी माया हिच्याशी चांगले वागण्याचे नाटक केले. या चांगल्या वागण्याच्या दरम्यान पती राजेश याने माया यांच्या दोन मुली अनुजा व आर्या यांना आपल्यासोबत फलटण वडगाव येथून कोर्ले येथे आणले. या दोन मुली बापासोबत कोर्ले येथे वास्तव्याला होत्या. या वास्तव्यादरम्यान सासू सुनंदा चव्हाण व सवत काजल चव्हाण यांनी या दोन्ही मुलींना त्रास सुरूच ठेवला होता. 11 जूनला रात्री 9 वाजण्याच्या सुमारास सुनंदा चव्हाण व आणि नणंद अनिता नागेश चांदेकर यांनी मयत मुलगी आर्या हिचा राहत्या घरात गळा आवळून खून केला व उर्वरित सर्व आरोपींनी त्यांना सहकार्य केले.
यानंतर सर्व कुटुंबीयांनी मिळून आर्याने आत्महत्या केल्याचा बनाव रचला गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान माया चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आठही जणांना लांजा पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button