
दारू पिण्यासाठी वापरण्यात आलेल्या किटनाशकाच्या बाटलीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे उघड.
रत्नागिरी तालुक्यातील तोणदे येथे विषारी द्रव प्राशन केल्याने दोन तरूणांचा मृत्यू झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारू पिण्यासाठी वापरण्यात आलेली बाटली किटनाशक फवारणीची असल्याने या तरूणांना विषबाधा होवून मृत्यू झाला, अशी बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कीटकनाशकासाठी वापरलेली बाटली दारू पिण्यासाठी देणार्या तरूणावर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला.
सुदर्शन प्रकाश शिरधनकर (३३) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार २० ऑगस्ट २०२४ रोजी सुदर्शन शिरधनकर, विघ्नेश देवेंद्र भाटकर (२४) व समाधान प्रकाश पाटील (४६) हे तोणदे येथे मोबाईल टॉवरच्या खाली दारू पिण्यासाठी बसले होते. संशयित आरोपी सुदर्शन याने कीटकनाशकासाठी वापरण्यात आलेल्या बाटलीमध्ये दारू मिक्स केली. तसेच ही दारू विघ्नेश व समाधान पाटील यांना पिण्यासाठी दिली. तसेच सुदर्शन याने देखील दारूचे प्राशन केले.दारूचे प्राशन केल्यानंतर तिघेही आपापल्या घरी निघून गेले.
दुसर्या दिवशी सकाळी तिघांनाही अस्वस्थ वाटून उलट्यांचा त्रास होवू लागला. यावेळी त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विघ्नेश भाटकर व समाधान पाटील यांचा मृत्यू झाला. एकाचवेळी तिघांना विषबाधा झाल्याने पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास करण्यात येत होता. तसेच मृतांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठविला होता.पोलिसांच्या तपासामध्ये संशयित आरोपीने किटकनाशकासाठी वापरलेली बाटली दारू पिण्यासाठी वापरल्याचा प्रकार समोर आला होता. व्हिसेरा अहवालात देखील विषबाधा झाल्याचे समोर आले होते.www.konkantoday.com