
रत्नागिरी उपकेंद्रावर पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती करावी,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे निवेदन
मुंबई विद्यापीठाचे रत्नागिरी उपकेंद्र सक्षम करण्याबाबतचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना रत्नागिरी येथे देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, भारतीय समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी १८५७ साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. आज विद्यापीठाला १६२ वर्षे पूर्ण झाली. पण विद्यापीठाचे नाव भारतातील पहिल्या १०० विद्यापीठांच्या यादीतसुद्धा दिसत नाही. भारतातील पहिले विद्यापीठ या नात्याने मुंबई विद्यापीठाला मानाचे स्थान मिळायला हवे होते. पण तसे होत नाही आहे. विद्यापीठात आज घडीला ८०० पेक्षा अधिक महाविद्यालये समाविष्ट आहेत.त्यामुळे वाढत्या कार्याला अधिक वाव मिळावा, यासाठी विद्यापीठाने उपकेंद्राची निर्मिती केली. मुंबई विद्यापीठाचा भार कमी करण्यासाठी झालेली ही उपकेंद्रे उभारून अनेक वर्षे झाली. परंतु अजूनही ती सक्षम झालेली नाहीत. कोकण किनारपट्टीतील भौगोलिक स्थितीनुसार निर्माण झालेल्या रत्नागिरी उपकेंद्राची मात्र विद्यापीठाने उपेक्षाच केली आहे. आजही रत्नागिरी,सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा विषयातील बाबींसाठी मुंबईत जावे लागते. त्यामुळे या उपकेंद्राचा काही उपयोग स्थानिक विद्यार्थ्यांना होत नाही. हे लक्षात घेऊन रत्नागिरी उपकेंद्रावर पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती करावी, परीक्षा विभागातील व्यवस्थापन उपकेंद्रात व्हावे, प्रशासकीय यंत्रणा विद्यापीठाप्रमाणेच अद्ययावत करावी, मुंबई विद्यापीठामध्ये शिकवले जाणारे सर्व कोर्सेस उपकेंद्रामध्ये शिकवले जावेत,विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उपलब्ध करून द्यावे, विद्यार्थ्यांसाठी उपाहारगृहाची व्यवस्था करावी आणि विद्यापीठ उपकेंद्रामध्ये बेसिक इंटरनेट सुविधा असावी, अशी मागणी करण्यात आली.
कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ देण्यापेक्षा मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सक्षम होणे आवश्यक आहे, या श्री. सामंत यांच्या भूमिकेचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने स्वागत केले.
www.konkantoday.com