संगमेश्वर तालुक्यातील आंबवली येथे विहिरीत पडलेल्या गवारेड्याला दिले जीवदान

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली वरचीवाडी येथील कठडा नसलेल्या विहिरीत पडलेल्या गवारेड्याची वनविभागाने ग्रामस्थांच्या सहकार्याने सुटका केली. जयराम सावंत यांच्या नव्याचे पाणी याठिकाणी असलेल्या विहिरीत गवारेडा पडल्याची घटना गुरूवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. विहिरीजवळून काही ग्रामस्थ जात असताना त्यांना पाण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता गवारेडा विहिरीत दिसून आला. याची खबर सरपंच संतोष सावंत यांनी देवरूख वनविभागाला दिली.
सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी दीपक खाडे, परिक्षेत्र वनाधिकारी प्रियंका लगड, देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला, वनरक्षक न्हानू गावडे, राजाराम पाटील, आकाश कडूकर, सूरज तेली, संजय रणधीर, राहूल गुंठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही विहीर अडचणीच्या ठिकाणी असल्याने कोणतेही वाहन, यंत्र (जेसीबी) जाग्यावर जाणे अशक्य होते. अशावेळी वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांना मदतीला घेऊन विहीर एका बाजूने खोदण्याचे काम सुरू केले. त्यामुळे गवारेडा विहिरीबाहेर आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button