मनसेची मतं लाटली जात आहेत- राज ठाकरे


गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र तसेच देशभरात निवडणूक आयोग आणि लोकसभा, वेगवेगळ्या राज्यांत घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीत मतचोरी झाली, असा आरोप केला जातोय. याच आरोपांमुळे वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे गटासह इतरही विरोधी पक्षांनीदेखील निवडणूक आयोग आणि भाजपाला धारेवर धरलं आहे. असे असतानाच आताच मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी मतचोरीच्या आरोपांवर मोठं भाष्य केलंय. मनसेच्या उमेदवारांना मतं मिळत आहेत. पण ती मतं लाटली जात आहेत. मतचोरी झाली आहे, असा मोठा दावा राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात जाहीरपणे केला आहे. राज ठाकरे यांच्या या आरोपांमुळे आता राज्यात नवं वादळ पेटण्याची शक्यता आहे. सत्ताधारी महायुती राज ठाकरेंच्या दाव्यानंतर आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या कित्येक दिवसांपासून राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) या तिन्ही पक्षांकडून निवडणुकीत मतचोरी केली जात आहे, असा आरोप केला जातोय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंत सध्या जवळीक निर्माण झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. असे असतानाच आता राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर हल्लाबोल करून एका प्रकारे उद्धव ठाकरे यांचीच बाजू घेतली आहे. आज एका भाषणात बोलताना त्यांनी मतचोरी होत असल्याचं विधान केलंय. ‘मी केव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये, असं तुम्ही समजू नका. आपली मतं चोरली जात आहेत. मतांमध्ये गडबड आहे. त्यामुळेच आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागत आहेत. ही गडबड होत नाही, असे तुम्ही समजून नका. आपली मतं चोरली जात आहेत. नव्हे तर ती लाटली जात आहेत,’ असा थेट आणि मोठा आरोप राज ठाकरेंनी केलाय.
पुढे बोलताना लोकांनी आपल्याला मतदान केले नाही, असे तुम्हाला वाटत असेल. पण हे खोटं आहे. लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे. पण ते आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही. मी त्या दिवशी शिवतीर्थावरही बोललो होतो. या मतांची चोरी करत-करत आज ते सत्तेवर आहे. याच चोरीच्या मतांच्या बळावर 2014 सालापासून सत्ता राबवल्या गेल्या, असं मोठं विधान राज ठाकरेंनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button