महायुतीचे पाचही उमेदवार विजयी होण्यात भाजपचे मोठे योगदान- जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पटवर्धन

रत्नागिरी-रत्नागिरी जिल्हा भाजपचे महायुतीचे पाचही उमेदवार विजयी होण्यामध्ये मोठे योगदान असेल, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणीत महायुतीला अभुतपूर्व यश मिळेल व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून धुरा सांभाळतील आणि हे ध्येय नजरेसमोर ठेवून रत्नागिरी भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी योगदान देत आहे, असे पटवर्धन म्हणाले.
भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण, कोकण प्रभारी तथा आमदार प्रसाद लाड, राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे या सर्वांनी रत्नागिरी भाजपला महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी सर्व ते योगदान देण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्षांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाजपच्या मतप्रवाहाचा मोठा मतदार आहे. या सर्व मतदारांनी पाचही विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांना विजयासाठी योगदान देतील, असा विश्‍वास जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केला.
दापोली मतदारसंघातही भाजपचे मतदार महायुतीचे उमेदवार योगेश कदम यांना आपले समर्थन देऊन विजयी करतील. महायुतीच्या धर्माशी प्रतारणा होणार नाही. योगेश कदम हे चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असेही जिल्हाध्यक्षांनी सांगितले. ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांची भेट घेतल्यानंतर अनेक गोष्टींचा खुलासा झाला आणि भविष्यात भाजप-सेना यांचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. उचित ते सर्व सहकार्य नवीन आमदार करतील, असा विश्‍वास जिल्हाध्यक्ष पटवर्धन यांनी व्यक्त केला.

*समन्वयातून प्रचारात*
सर्व मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महायुतीच्या प्रचारातही ते सहभाग घेत आहेत. एकमेकांशी समन्वय राखून प्रचार सुरू असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्‍वास पटवर्धन यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button