
आंबा घाटाच्या दुरूस्तीसाठी पाहिजेत अडीच कोटी रुपये
रत्नागिरी :रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर असलेल्या आंबा घाटाच्या रस्त्याला मधोमध भेगा गेल्या असून रस्त्याच्या साईडला असणार्या संरक्षण भिंतीही काही ठिकाणी कोसळल्या आहेत. या सर्वाला ढगफुटी कारणीभूत असल्याचा दावा बांधकाम खात्याने केला असून असा प्रकार यापूर्वी घडला नव्हता. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे पाणी आत मुरल्याचे बांधकाम खात्याचे म्हणणे आहे. आता आंबा घाटातील हा मार्ग सुरळीत करण्यासाठी कोसळलेल्या भागाला भराव घालावा लागणार आहे. तसेच रूंदीकरणही करावे लागणार आहे. सध्या या घाटातून एकेरी वाहतूक सुरू असून दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्यासाठी खचलेल्या भागाच्या विरूद्ध बाजूला डांबरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. सध्या भेगेवर तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे. पाऊस गेल्यानंतर बाजूपट्टीच्या भागाचे डांबरीकरण केल्यानंतरच दुहेरी वाहतूक सुरू करता येणार आहे. यासाठी आता अडीच कोटी निधीची आवश्यकता असून त्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. विशेष म्हणजे पावसापूर्वी आंबा घाटाच्या दुरूस्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते.
www.konkantoday.com