
जनतेच्या कराच्या पैशाची उधळपट्टी नुकतेच डांबरीकरण केलेल्या रस्त्याची पुन्हा खोदाई
रत्नागिरी ः शहरातील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी रत्नागिरी शहरात पावसाच्या तोंडावर डांबरीकरणाचे काम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. शहरातील विविध भागातील आतील रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे. परंतु हे डांबरीकरण काही दिवस तरी टिकेल अशी अपेक्षा असतानाच नव्यानेच डांबरीकरण केलेला रस्ता लगेचच गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आल्याने जनतेचा कराचा पैसा कसा वाया जात आहे याचे उदाहरण नुकतेच घडले आहे.
शहरातील आरोग्यमंदिर ते मजगांव रोड जोड रस्ता गेले कित्येक दिवस खड्डेमय होता. त्याचे नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. हे डांबरीीकरण ताजे असतानाच हा रस्ता गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आला असून त्यामुळे नागरिकांच्यात संताप निर्माण झाला आहे. जर या रस्त्यावरून गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करायची होती तर आधी खोदाई करून नंतर डांबरीकरण करता आले असते. त्यामुळे हा रस्ता पावसाळ्यातही चांगला टिकला असता परंतु तसे न करता आधी डांबरीकरण नंतर खोदाई या धोरणामुळे जनतेचे कराचे पैसे कसे खड्ड्यात जात आहेत हे अशा या उदाहरणावरून दिसून येते.