
पूर आल्याने मुंबई- गोवा महामार्गावरील आंजणारी पूल पाच तासांनंतर वाहतुकीस खुला
लांजा : तालुक्यातील काजळी नदीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. सोमवारी ८ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून मुंबई – गोवा महामार्गावर आंजणारी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. पुलावरून वाहतूक बंद करण्यात आल्याने दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल पाच तासानंतर सायंकाळी चार वाजता आंजणारी पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली.
आंजणारी मठ येथील स्वयंभू श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून आंजणारी येथील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पोलिसांनी याठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहनांना थांबवून ठेवलेे होते. तर या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. यामध्ये काही वाहतूक ही पावस मार्गे वळवण्यात आली होती. या ठिकाणी लांजा पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील तसेच पोलिस आणि होमगार्ड या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत. विलवडे येथील मुचकुंदी नदीला आलेल्या पुरामुळे हा रस्ता पाण्याखाली गेला आहेे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहेे. तर प्रचंड पावसामुळे काही ठिकाणी विद्युत तारा, पोल पडून वीज पुरवठा खंडित झाला आहे.
