
‘श्रावणधारा’ काव्यमैफिल रंगली – सौ.ऋतुजा कुळकर्णी प्रथमस्पर्धेत रसिकांनी अनुभवली काव्याची सरिता
रत्नागिरी : संकल्प कलामंच आणि को म सा प युवाशक्ती दक्षिण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्रावणधारा काव्यमैफिल’ हा बहारदार कार्यक्रम नुकताच रत्नागिरीत रंगला. पावसाळ्यातल्या श्रावणी थेंबांसारखी काव्यरसधारा रसिकांच्या अंतःकरणात झिरपत गेली. सहभागी स्पर्धकांच्या सादरीकरणाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
या स्पर्धेत सौ.ऋतुजा उमेश कुळकर्णी ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. अर्चना देवधर ह्यांना द्वितीय क्रमांक तर वृषाली टाकळे ह्यांना तृतीय क्रमांक जाहीर झाला. इतर सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी को.म .सा. प युवाशक्ती प्रमुख, रत्नागिरी शाखा गुरुदेव नांदगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व नटराज पूजनाने झाली. ज्येष्ठ लेखिका सुनेत्रा जोशी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. को म सा प युवाशक्ती दक्षिण विभाग प्रमुख श्री अरुण मौर्य यांनी मनोगत व्यक्त करताना संकल्प कलामंचचे अध्यक्ष विनयराज उपरकर यांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित केले. यावेळी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
संकल्प कलामंचतर्फे अध्यक्ष श्री विनयराज उपरकर, आण्णा वायंगणकर, उपाध्यक्षा रक्षिता पालव व बाबा साळवी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अखेरीस आण्णा वायंगणकर यांनी स्वतःची कविता सादर करून काव्यमैफिलीला सुंदर पूर्णविराम दिला व आभार मानले.




