
विकास आराखड्याविरोधात लांजावासियांचा ’एल्गार
. ’नगर पंचायत प्रशासनाने जाहीर केलेल्या शहर प्रारुप विकास आराखड्याविरोधात (डीपी प्लॅन) संपूर्ण लांजा गाव एकवटला असून लोकांच्या घरादारांवर नांगर फिरवणारा डीपी प्लॅन जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत संपूर्ण गावच्यावतीने या विरोधात एकमुखी लढा देण्याचा ठाम निर्धार लांजा चव्हाटा मंदिर येथे पार पडलेल्या लांजावासियांच्या बैठकीत करण्यात आला.लांजा नगर पंचायतीच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या डीपी प्लॅनमुळे लांजा नगर पंचायत कार्यक्षेत्रातील वाड्या-वस्तींमधील अनेक घरे तसेच शेतजमिनी यांच्यासह अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याचे सांगत नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. तर डीपी प्लॅनमध्ये आवश्यक ते बदल करू, कोणावरही अन्याय होणार नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत डीपी प्लॅन रद्द होणार नाही, असे मत आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत ठामपणे जाहीर केले होते.या पार्श्वभूमीवर लांजा गाव कमिटीच्यावतीने सोमवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला गावातील नागरिक उपस्थित होते. यावेळी हा डीपी प्लॅन लांजावासियांना उद्ध्वस्त करणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापले पक्ष बाजूला ठेवून केवळ आणि केवळ लांजा गावच्या हितासाठी एकत्र येऊया आणि हा डीपी प्लॅन रद्द करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. कोणत्याही परिस्थितीत हा डीपी प्लॅन रद्द झालाच पाहिजे, त्यामुळे सर्वांनी एकत्रपणे लढा देऊया. त्यासाठी प्रसंगी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा लागला तरी चालेल परंतु आता मागे हटायचे नाही, असा निर्धार यावेळी करण्यात आला.www.konkantoday.com