
जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये महासंस्कृती महोत्सव
छत्रपती शिवरायांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त रत्नागिरी शहरात ११ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस महासंस्कृती महोत्सव होणार आहे. या महोत्सवांतर्गत महाराष्ट्राची संस्कृती, लोकपरंपरा, स्थानिक सण, उत्सव यांचे दर्शन घडवणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी या महोत्सवाच्या नियोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रशासनाची बैठक घेतली.
या बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार सर्वसाधारण हनुमंत म्हेत्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारूती बोरकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री सामंत म्हणाले या महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, वक्तृत्व आणि निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच दशावतार, जाखडी, नमन यासारख्या लोककलांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचे सचित्र दालन, पर्यटन विषयक दालनही असेल असे सामंत म्हणाले. यात बचतगटांच्या विक्री स्टॉलचे नियोजन करण्यात आले असून या महासंस्कृती महोत्सवाच्या नियोजनामध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, अशा सूचना सामंत यांनी या बैठकीत केल्या.
www.konkantoday.com