
२४ सुरक्षा रक्षक वाऱ्यावरसुरक्षा रक्षकांचे वेतन लाल फितीत -संबंधितांवर कारवाई करण्याची भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांची मागणी
रत्नागिरी- शासकीय रूग्णालयाच्या कोवीड केअर सेंटरमध्ये आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावणाऱ्या २४ सुरक्षारक्षकांना अजून वेतनच मिळालेले नाही. हे वेतन जाणीवपूर्वक अडकवून ठेवले आहे. या रक्षकांनी सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे हे वेतन थकवणाऱ्या जिल्हा शल्य चिकीत्सकांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी भाजयुमो द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन यांनी केली आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनाबाधिकांची वाढती संख्या पाहून रत्नागिरी, लांजा, पाली, संगमेश्वर व कामथे येथे या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. गेल्या दीड वर्षांत त्यांना वेतनच देण्यात आले नाही. मंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे दाद मागूनही हा पगार लाल फितीत अडकला आहे. त्यामुळे या सुरक्षा रक्षकांनी २६ जानेवारीला उपोषणाचा निर्णय घेतला आहे. यापेक्षा रत्नागिरीकरांचे दुर्दैव काय असावे. ज्यांनी कोरोना काळात काम केले त्यांना शासन किंवा जिल्हा प्रशासन यंत्रणा वेतन देऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
कोविडच्या काळात सुरक्षा रक्षक महामंडळ व मेस्को यांच्याकडे सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. परंतु त्यांनी ताबडतोब सुरक्षा देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी टास्क फोर्सच्या बैठकीमध्ये खासगी एजन्सीमार्फत सुरक्षा सेवा घेण्याचे ठरविले व खासगी एजन्सीने विनाविलंब मे २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कोवीड काळात सुरक्षेची जबाबदारी घेतली. एकूण २४ सुरक्षारक्षक कोविड सेंटरवर काम करत होते.
गेले आठ महिने झाले जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संबंधित सुरक्षा रक्षकांचा पगार अदा केलेला नाही. सुरक्षा रक्षकांनी आपला जीव धोक्यात घालून कोविड सेंटरमध्ये डयुटी केली. पण पगार आजतागायत मिळालेला नाही. तत्कालिन जिल्हाधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकांचा पगार SDRF/ CSSR फंडातून करणेसाठी टिपण्णी आदेश काढला. परंतु कोविड काळातील निवासी उपजिल्हाधिकारी पण बदली होऊन गेले. नवीन बदलून आलेले जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यालयाने सुरक्षा रक्षकांचा पगार मिळणेबाबत आजतागायत दखल व जबाबदारी घेतली नसल्याबद्दल पटवर्धन यांनी टीका केली
या सुरक्षा रक्षकांना वेळोवेळी एकच कारण सांगितले जाते ते म्हणजे शासनाकडून निधी आलेला नाही. कोविड निधी उपलब्ध आहे, पण त्यामध्ये सुरक्षा सेवा नाही म्हणून नकार दिला जात आहे. परंतु गेले सहा महिने दोन्ही कार्यालयांनी फक्त पत्रव्यवहार करण्यात धन्यता मानली आहे. त्याचप्रमाणे जिल्हा शल्य चिकीत्सक सुरक्षा रक्षकांच्या पगारसंदर्भात योग्य ती माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास पुरविण्यात अपयशी ठरल्या आहेत. त्यांच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत. जिल्हा शल्य चिकीत्सकांची जिल्हा रुग्णालय प्रशासनावर पकड नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे बिघडला असल्याचा आरोप अनिकेत पटवर्धन यांनी केला
सुरक्षा रक्षकांनी जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांना दिवाळीच्या अगोदर भेटून कैफीयत मांडली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे आदेश दिले होते. कामगार मंत्र्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांना फोनवर व पत्राद्वारे वेतनाबाबत लक्ष घालण्यास सांगितले होते. जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय पत्रव्यवहार करण्यात व कागदी घोडे नाचवण्यात धन्यता मानत आहेत. ते जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहेत. त्यामुळे सर्व सुरक्षा रक्षक येत्या २६ जानेवारीला पगारासाठी आमरण उपोषण करणार आहेत.
सुरक्षा रक्षकांनी आता न्याय कोणाकडे मागायचा. एखादी दुर्घटना होता, शासन जागे होणार काय, राज्यात आता तिसरी लाट व लॉकडाऊन येण्याची शक्यता आहे. सुरक्षा रक्षकांची पगार न मिळाल्याने परत सेवा करण्याची मानसिकता नाही. जिल्ह्यातील तर सुरक्षा एजन्सीना सेवा देणार नाहीत. कारण शासनाकडून वेळेत पगार मिळत नाही. जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या लाल फितीतील कारभार सुधारा, जिल्हा शल्य चिकीत्सकांवर शासनाने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी अनिकेत पटवर्धन यांनी केली.
www.konkantoday.com