
कसलाही अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नाही-पालकमंत्री नितेश राणे
कसलाही अणुऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी देखील ते स्पष्ट केले असून, पर्यावरणाला हानी होईल असा एकही उद्योग, व्यवसाय सिंधुदुर्गात येणार नाही.रोजगारासाठी तरुण सिंधुदुर्गच्या बाहेर गेले असून, त्यांना परत आणणे देखील आवश्यक आहे. मात्र, आंदोलनामुळे सिंधुदुर्गची प्रतिमा खराब होऊ नये, गुंतवणूकदारांनी इथे येताना सकारात्मकताही दाखवली पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाला हानीकारक प्रकल्प येणार नाही हीच आमची भूमिका आहे, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
देशातून नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ज्याप्रमाणे मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा दारू, ड्रग, मटका, जुगार, बीफ व्यापार पूर्णपणे नष्ट करण्याचा आमचा निर्धार आहे. केवळ किरकोळ विक्री करणाऱ्यांवरच नाही, तर मुख्य सूत्रधारांवर कारवाई केली जात आहे. गुन्हेगार हा गुन्हेगार असून त्यांचा पक्ष, झेंडा, जात, धर्म न बघत कठोरातली कठोर कारवाई केली जाईल. अवैध धंदे मुक्त सिंधुदुर्ग करेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कुठल्याही टोकाला जाण्याची माझी तयारी असून मागे हटणार नाही, असा सज्जड दम पालकमंत्री राणेंनी दिला.




