
रत्नागिरी १८ एप्रिल रोजी शेतकरी सभेचे आयोजन
रत्नागिरी : बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. ही सभा १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता नाचणे रोड येथील बालाजी मंगल कार्यालयात होणार आहे.
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे बोगस व निकृष्ट खते, किटकनाशके व औषधांमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानातील बदल, अनियमित पाऊस, वाढलेले तापमान व किड-रोगांचे प्रमाण वाढल्याने शेती व मच्छीमारी दोन्ही क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत आहेत. या सर्व गंभीर प्रश्नांवर चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी शेतकरी सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभेमध्ये बोगस औषध कंपन्यांवर कारवाई, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, तसेच हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर उपाययोजना यावर सविस्तर चर्चा होणार आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व आंबा उत्पादक, काजू उत्पादक व मच्छीमार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोंकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादके विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश (बावा) साळवी आणि रत्नागिरी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे.




