रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ वातावरण

आंबा बागायतदारांवर चिंतेचे साव

रत्नागिरी : ऐन एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढणे अपेक्षित असताना, जिल्ह्यात मात्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्याच्या विविध भागांत, विशेषतः किनारपट्टी भागात दाट काळे ढग जमा झाले असून, पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रत्नागिरी शहरासह किनारपट्टी लगतच्या गावांमध्ये आज सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले नाही. “ऐन उन्हाळ्यात पाऊस पडतोय की काय?” असा प्रश्न पडावा, इतपत मळभ आलेली पहायला मिळाली. दुपारच्या सुमारास शहरात काही वेळासाठी पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे हवेत कमालीचा उकाडा वाढला असून, हे वातावरण पावसासाठी पोषक असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांमध्ये कोकण किनारपट्टीवर पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. आठवडाभरापूर्वीच जिल्ह्याच्या अनेक भागांत गारपिटीसह मुसळधार पाऊस झाला होता. त्यातून सावरत असतानाच पुन्हा एकदा पावसाचे संकट उभे राहिल्याने सर्वसामान्यांची तारांबळ उडाली आहे.

या अवकाळी वातावरणाचा सर्वाधिक फटका कोकणचा राजा असलेल्या हापूस आंब्याला बसत आहे. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे आंब्यावर ‘तुडतुड्या’ व ‘करपा’ रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. पावसाच्या सरींमुळे तयार झालेला आंबा गळून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. हंगामाला सुरुवात झालेली असतानाच निसर्गाच्या या लहरीपणामुळे बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

आधीच वाढत्या तापमानामुळे आंबा होरपळला होता, त्यात आता या ढगाळ वातावरणामुळे आणि पावसाच्या धास्तीमुळे बागायतदारांचे कंबरडे मोडले आहे. हातात आलेला घास निसर्ग हिरावून नेतो की काय, अशी भीती बागायतदार व्यक्त करत आहेत. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button