
रत्नागिरीत गॅस सिलेंडर टंचाईवर तोडगा
रत्नागिरी : तालुक्यात गेल्या महिनाभरापासून भेडसावत असलेल्या गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांत अधिकारी जीवन देसाई यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी गॅस वितरक एजन्सीचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
या बैठकीत प्रांत अधिकारी श्री. देसाई यांनी रत्नागिरीतील गॅस उपलब्धतेची सद्यस्थिती स्पष्ट करत केंद्र शासनाने घालून दिलेल्या निकषांची माहिती दिली. अत्यावश्यक सेवांना प्राधान्याने गॅस पुरवठा करण्यात येणार असून, उपलब्ध साठ्यातील २० टक्के व्यापारी गॅस सिलेंडर हॉटेल व्यावसायिकांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, संबंधित गॅस एजन्सीकडे नोंद असलेल्या हॉटेल व्यावसायिकांना गेल्या वर्षभरातील सरासरी वापराच्या आधारे या २० टक्के कोट्यातून सिलेंडर वितरित केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. लहान व्यावसायिकांनाही गॅस उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, शहरात पाईपलाईन गॅस सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याची माहितीही प्रांत अधिकाऱ्यांनी दिली.
हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा विश्वास श्री. देसाई यांनी व्यक्त केला.
या बैठकीस हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई यांच्यासह गणेश धुरी व सुहास ठाकुरदेसाई उपस्थित होते. गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांबद्दल उपस्थितांनी प्रांत अधिकाऱ्यांचे आभार मानले.




