
कौटुंबिक वादातून पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला; काकाविरुद्ध गुन्हा दाखल
*राजापूर, तालुक्यातील सौंदळ, भालेकरवाडी येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान हिंसक घटनेत होऊन सख्ख्या काकाने पुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पुतण्या गंभीर जखमी झाला असून, संबंधित काकाविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवार, दि. ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. तुकाराम गोपाळ चव्हाण (वय ७२) हे आपल्या पत्नी व मुलासोबत घरात असताना काही घरगुती कारणावरून वाद सुरू होता. त्यावेळी त्यांचे भाऊ दशरथ गोपाळ चव्हाण तेथे आले. त्यांनी जुन्या वादाच्या मुद्द्यावरून पुन्हा बोलण्यास सुरुवात केली.
यावेळी फिर्यादींचा मुलगा नरेंद्र तुकाराम चव्हाण (वय ३२) याने आरोपीला जाब विचारला असता, दशरथ चव्हाण यांचा राग अनावर झाला. त्यांनी प्रथम आपल्या हातातील बॅटरीने नरेंद्रच्या डोक्यावर मारहाण केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला.
मात्र, त्यानंतरही आरोपी आपल्या घराच्या अंगणातून शिवीगाळ करत असल्याने नरेंद्र त्याला जाब विचारण्यासाठी गेला असता, आरोपीने अंगणात ठेवलेली लोखंडी कुऱ्हाड उचलून त्याच्या डोक्यावर वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात नरेंद्र चव्हाण गंभीर जखमी झाला.
या प्रकरणी तुकाराम चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजापूर पोलीस ठाण्यात दि. ५ एप्रिल २०२६ रोजी भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम ११८ (१), ३५१ (१), ३५१ (२) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
.




