
अवैध मद्याविरोधात उत्पादन शुल्कचा दणका
रत्नागिरी : जिल्ह्यात अवैध मद्याची निर्मिती, वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरूद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात तब्बल ४ कोटी ५८ लाख ३० हजार ४०१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मोहिमेत एकूण १ हजार ८१ आरोपींना अटक केली असून, गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी रोखण्यावर विभागाने विशेष भर दिला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यकारी व भरारी पथकांकडून हातभट्टीची ठिकाणे शोधणे, रात्रीची गस्त घालून संशयित वाहनांची तपासणी करणे आणि बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांवर धाडी टाकण्याचे सत्र सुरू आहे. या वर्षभरात विभागाने १०६६ वारस व १४४ बेवारस, असे एकूण १ हजार २१० गुन्हे नोंदवले. यामध्ये ३३ हजार ४०३ लिटर हातभट्टीची दारू, २८ हजार लिटर रसायन आणि मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याचा साठा हस्तगत करण्यात आला. विशेषतः गोवा राज्यातून होणारी तस्करी रोखण्यासाठी केलेल्या कारवाईत २ कोटी ९२ लाख रुपयांचा माल आणि ७ वाहने जप्त केली आहेत. अवैध मद्याविरोधातील ही मोहीम यापुढेही तीव्र राहणार आहे.
जिल्ह्यात कुठेही हातभट्टी, बनावट माडी किंवा तस्करी होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी ८४२२००११३३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर किंवा १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक राज्य उत्पाटन शल्क विभागाने केले आहे.
२९ प्रकरणात चांगली वर्तणूक राखण्याची बंधपत्रे केवळ रस्त्यांवरील वाहतूकच नव्हे, तर कोकण रेल्वेतून होणारा अवैध मद्यतस्करी रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांच्या समन्वयाने प्रवाशांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. मुंबई-गोवा आणि कोल्हापूर-रत्नागिरी या महामार्गावरही पथके तैनात करण्यात आली आहेत.




