रत्नागिरी वनविभागाला “वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल” राज्यस्तरीय सुवर्ण पदक जाहीर.

विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांच्यासह तिघांना सुवर्ण पदक जाहीर.


रत्नागिरी : वनसंपत्तीचे प्रभावी संरक्षण आणि वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल दिल्या जाणाऱ्या मानाच्या राज्यस्तरीय पदकांची घोषणा महाराष्ट्र शासनाने केली असून, यामध्ये रत्नागिरी जिल्ह्याने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

महसूल व वन विभागाने २५ मार्च २०२६ रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, रत्नागिरीत कार्यरत असलेल्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा शोभा नरेंद्र देसाई यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रतिष्ठेचे सुवर्ण पदक जाहीर झाले आहे. श्रीमती देसाई यांच्या या यशामुळे संपूर्ण रत्नागिरी वनविभागात उत्साहाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या गौरव सोहळ्यात केवळ वरिष्ठ अधिकारीच नव्हे, तर जमिनीवर राबणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही सुवर्ण यश संपादन केले आहे.

रत्नागिरी वनवृत्तातील वनपाल श्री. सुरेश आत्माराम उपारे आणि श्री. रामदास दत्तात्रय खोत या दोन कर्तव्यदक्ष वनपालांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, वनसंरक्षणाच्या कामात मोलाची भूमिका बजावणाऱ्या एका वनरक्षकास रजत पदक देऊन गौरविण्यात आले आहे.
या सर्व पदकविजेत्यांच्या निवडीसाठी अपर मुख्य सचिव (वने) यांच्या अध्यक्षते खालील समितीने त्यांच्या गोपनीय अहवालांची आणि तांत्रिक कार्यक्षमतेची कसून तपासणी केली होती.

सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांतील उत्कृष्ट कामासाठी राज्यातील एकूण ५९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही पदके बहाल करण्यात आली आहेत.

वन/वन्यजीव संरक्षण, व्यवस्थापन आणि वन विस्तार यांसारख्या सहा विविध कार्यप्रकारांमध्ये हे पुरस्कार देण्यात आले असून, यामुळे वनदलातील कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

रत्नागिरीच्या या सुवर्णविजेत्या शिलेदारांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या यशाची नोंद त्यांच्या सेवापुस्तकात घेण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button