
रत्नदुर्ग किल्ल्यावर गुढीपाडवा साजरा होणार
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या "गड तिथे गुढी" उपक्रमांतर्गत आयोजन
रत्नागिरी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या (महाराष्ट्र राज्य) रत्नागिरी विभागातर्फे “गड तिथे गुढी” या उपक्रमांतर्गत यंदाचा गुढीपाडवा शहराजवळील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १९ मार्च रोजी सकाळी ७ ते १० यावेळेत आयोजित केला आहे.
या शुभ दिनाचे औचित्य साधून सर्वांनी एकत्र येऊन गुढी उभारणी तसेच पारंपरिक पूजा-अर्चा आणि छत्रपती शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले जाणार आहे.
गुढीपाडवा हा नवा उत्साह, नवचैतन्य आणि पारंपरिक संस्कृती जपण्याचा दिवस आहे. म्हणूनच, फक्त रत्नदुर्गच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गड-किल्ल्यांवर हा सोहळा साजरा व्हावा. महाराष्ट्रातील प्रत्येक गड-किल्ल्यावर गुढी उभारून, भगव्या अभिमानाने हा दिवस सोहळ्याच्या स्वरूपात साजरा करण्याची आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास जपण्याची तसेच आपल्या संस्कृतीचे वैभव वाढवण्याची अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.
अधिक माहितीसाठी 7666708201 / 9920905920 या क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




