मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा अपघातामुळे गुरुवारी तात्पुरती विस्कळीत,रो-रो बोटीला मालवाहू टग बोटीची जोरदार धडक


कोकणच्या पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरलेली मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला एका किरकोळ अपघातामुळे फटका बसला त्यामुळे यारो रो फेरीबोटीची सेवा गुरुवारी तात्पुरती विस्कळीत झाली. विजयदुर्ग बंदरात उभ्या असलेल्या रो-रो बोटीला एका मालवाहू टग बोटीने जोरदार धडक दिली.या अपघातामुळे रो रो बोटीचं नुकसान झाले मोठ्या उत्साहाने रो रो बोटीने प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र तांत्रिक बिघाडामुळे काही प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत करण्याची वेळ प्रशासनावर आली.
१ मार्चपासून सुरू झालेल्या या जलवाहतुकीला कोकणवासीयांचा आणि पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी ही रो-रो बोट विजयदुर्ग बंदरात प्रवाशांना घेण्यासाठी उभी होती. याच दरम्यान, बंदरात काही वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी आलेल्या एका छोट्या टग बोटीने रो-रो बोटीला धडक दिली.

मेरीटाईम बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित टग बोटीच्या भोवती सुरक्षेसाठी आवश्यक असलेली संरक्षक रबर ट्यूब नव्हती. त्यामुळे रो-रो बोटीला चार छोटी छिद्रे पडली. या अपघातामुळे बोटीची सुरक्षितता लक्षात घेता काही प्रवाशांनी बोटीतून प्रवास करायला नकार दिला. परिणामी २० प्रवासी आणि ७ वाहनांच्या बुकिंगचे पैसे प्रशासनाला परत करावे लागले.
दुरुस्तीनंतर सेवा पूर्ववत

अपघातानंतर तातडीने विजयदुर्ग बंदरातच बोटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. दुरूस्तीचं काम पूर्ण झल्यानंतर बोट प्रवासासाठी योग्य असल्याची खात्री केली. दिवसभराच्या खोळंब्यानंतर, सायंकाळी ७ वाजता ही रो-रो बोट पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button