
मुंबई-विजयदुर्ग ‘रो-पॅक्स’ जलवाहतूक सेवेचा दिमाखात शुभारंभ
कोकणच्या जलप्रवासातील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. मुंबईतील भाऊचा धक्का येथून मंत्री नितेश राणे यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनातून साकार झालेली ही सेवा कोकण आणि मुंबईतील दुवा अधिक मजबूत करणारी ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणी मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या असून, राज्याच्या सागरी वाहतुकीतील ही मोठी झेप असल्याचे म्हटले आहे.
वेळेची बचत आणि आधुनिक सुविधा :
ही रो-पॅक्स सेवा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आहे. सुमारे ६२५ प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीतून एकाच वेळी ४० चारचाकी आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेली जाऊ शकतात. मुंबई ते विजयदुर्ग हे अंतर आता अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण होणार असल्याने प्रवाशांच्या वेळेत आणि श्रमात मोठी बचत होणार आहे. बोटीमध्ये आरामदायी आसनव्यवस्था, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सुरक्षा उपकरणांची विशेष काळजी घेण्यात आली आहे.
कोकणच्या अर्थव्यवस्थेला नवी गती :
या प्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, “ही सेवा केवळ प्रवासाचे साधन नसून कोकणच्या विकासाचा महामार्ग आहे. यामुळे पर्यटन, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांसाठी ही सेवा अत्यंत दिलासादायक ठरेल.”
मुंबईतून सकाळी सुटलेली ही बोट ४ वाजून २० मिनिटांनी विजयदुर्ग बंदरात पोहोचली, जिथे प्रवाशांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. पहिल्याच फेरीला पर्यटक आणि प्रवाशांचा मोठा प्रतिसाद लाभला




