
तुटक्या खिडक्या, अस्वच्छ परिसर, शेवाळलेल्या भिंती अशी आहेत जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवासस्थानाची अवस्था
रत्नागिरी जिल्हा परिषदेचा चार वर्षांचा प्रदीर्घ प्रशासकीय कार्यकाळ संपल्यानंतर अखेर लोकप्रतिनिधींच्या हाती कारभाराची सूत्रे आली असली, तरी प्रशासनाच्या अनास्थेमुळे नव्या पदाधिकार्यासमोर मूलभूत प्रश्न उभा ठाकला आहे. अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षपदी विलास चाळके यांची बिनविरोध निवड झाली असली, तरी अधिकृत निवासस्थानांच्या दुरवस्थेमुळे या विजयावर विरजण पडल्याचे चित्र आहे.
मंडणगड तालुक्यातील भिंगळोली मतदारसंघातून निवडून आलेल्या अध्यक्षा अस्मिता केंद्रे यांना जिल्हा मुख्यालयात सुसज्ज निवासाची नितांत गरज आहे. मात्र, गेल्या चार वर्षांत प्रशासनाने या निवासस्थानांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आज या इमारती भन अवस्थेत पोहोचल्या आहेत. वाढलेले रान, तुटलेल्या खिडक्या, शेवाळलेल्या भिंती आणि अस्वच्छ परिसर यामुळे या बंगल्यांना अक्षरशः ’भंगार’ स्वरूप आले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्याचा दर्जा असतानाही त्यांच्या निवासाच्या सुविधेकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वी तरी या निवासस्थानांची दुरुस्ती व स्वच्छता होणे अपेक्षित असताना तसे न झाल्याने प्रशासनाची कार्यपद्धतीच प्रश्नचिन्हाखाली आली आहे. अध्यक्षांसह उपाध्यक्ष, शिक्षण, समाजकल्याण, बांधकाम सभापती तसेच पंचायत समिती पदाधिकार्यांच्या निवासाचाही प्रश्न गंभीर बनला आहे. नव्या पदाधिकार्यांना काम सुरू करतानाच निवासाच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, या निवासस्थानांची तातडीने डागडुजी करून योग्य सुविधा उपलब्ध करून न दिल्यास, हा प्रश्न के वळ पदाधिकार्यांचा न राहता संपूर्ण जिल्ह्याच्या स्वाभिमानाशी निगडित ठरेल, असा संतप्त सूर उमटत आहे.www.konkantoday.com




