
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे शिवजयंतीला निघणार शोभायात्रा
तिथीनुसार ६ मार्चला आयोजन
रत्नागिरी : येथील क्षत्रिय मराठा मंडळातर्फे दरवर्षी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जयस्तंभ ते मारुती मंदिर या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीची सवाद्य मिरवणूक तथा शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यंदा या शोभायात्रेला रत्नागिरी शहरासह आसपासच्या गावांतील शेकडो मराठा बंधू-भगिनी पारंपरिक वेषभूषेत सहभागी होणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीयेला झाला. यंदा तृतीय येत्या ६ मार्च रोजी आहे. या दिवशी शोभायात्रेला सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथून सुरवात होऊन रात्री १० वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सांगता होणार आहे. प्रथेप्रमाणे सायंकाळी ४ वाजता रत्नदुर्ग किल्ल्यावरील देवी भगवती मंदिर येथून शिवज्योतीचे प्रस्थान होऊन सायंकाळी ५.३० वाजता जयस्तंभ येथे आगमन झाल्यानंतर छत्रपती महाराजांच्या पालखीचे मिरवणुकीला आरंभ होईल.
शोभायात्रेत विविध ढोल, ताशे, झांजपथक, मर्दानी खेळ आणि महाराजांच्या जीवनावरील चित्ररथांचा समावेश आहे. ज्यांना चित्ररथांचा समावेश करायचा आहे त्यांनी मंडळाचे पदाधिकारी राकेश नलावडे, प्रदीप साळवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्षत्रिय मराठा मंडळाचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी केले आहे.
रत्नागिरी शहर व पंचक्रोशीतील सर्व मराठा समाज बांधव एकत्र येऊन ही शोभायात्रा आयोजित करण्यात येत आहे. रत्नागिरी पंचक्रोशीतील गावातून देखावा चित्ररथ करणार असतील तर क्षत्रिय मराठा मंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




