अणुस्कुरा घाटात १४ चाकी ट्रकचा अपघात

राजापूर : तालुक्यातील पांगरी येथे अणुस्कुरा घाटात आज (२९ मार्च) सकाळी सुमारे १०.१५ वाजण्याच्या सुमारास सिमेंट पत्रे वाहतूक करणारा १४ चाकी भारत बेन्झ ट्रकचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघाताचा दुरक्षेत्र पोलिस ठाणे रायपाटण येथे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक येथून पाचलकडे येणारा ट्रक (क्र. केए-१६ सी-७०१५) अणुस्कुरा घाटातील वळणावर वेग आणि अतिलोडमुळे चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाला. ट्रकमध्ये सिमेंट पत्रे भरलेले होते. अपघातात ट्रकचे नुकसान झाले असून, मागील भागातील सिमेंट पत्रे रस्त्याच्या कडेला पडून फुटल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी चालक शोहैब जमीर बाशा (वय २६, रा. बडावणे, ता. चलकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) याच्याविरोधात निष्काळजीपणे व भरधाव वेगात वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती मिळताच रायपाटण पोलिस दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून पुढील तपास कमलाकर पाटील करत आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button