
रत्नागिरी जिल्ह्यातील पडिक विहिरी ठरताहेत बिबट्यांसाठी ’मृत्यू सापळा’
भक्ष्याच्या शोधात असलेले बिबटे अंधारात उघड्या विहिरींचा अंदाज न आल्याने त्यात पडण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आता रत्नागिरी वनविभागाने कंबर कसली अहि. जिल्ह्यातील ६५० पडिक ब्रिहिरींच्या कठडा बंदिस्तीसाठी हालचाली सुरू केल्याची माहिती वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रत्नागिरी वनविभागाच्या अंतर्गत येणार्या दापोली, चिपळूण आणि रत्नागिरी विभागामध्ये बिबट्यांचा वावर मोठा आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, जिल्ह्यात दरवर्षी सुमारे ३० ते ४० बिबटे विहिरीत पडण्याच्या घटना घडतात. अनेकदा वेळेवर मदत न मिळाल्याने किंवा विहिरीत पाणी जास्त असल्याने या मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागतो. हे अपघात रोखणे आता वनविभागासमोर मोठे आव्हान ठरले आहे.
विहिरींच्या या कामासाठी मोठ्या निधीची गरज आहे. यासाठी वनविभागाने केवळ आपल्या आर्थिक अंदाजपत्रकावर अवलंबून न राहतो इतर मार्गाचाही विचार सुरू केला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे कठडे बांधणे शक्य आहे का, यादृष्टीनेही प्रशासकीय पातळीवर विचारविनय सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.www.konkantoday.com




