
भारतीय तटरक्षक दल आता सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण
तब्बल ११,८२१ नागरिकांचे प्राण वाचवणारे देवदूत, ५४,४३७ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करणारे योद्धे आणि ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमांतून शत्रूला धडकी भरवणारे भारतीय तटरक्षक दल आता सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. सागरी सुरक्षा आणि पर्यावरण रक्षणाचे अढळ व्रत घेणार्या या दलाने गेल्या ५० वर्षांत केवळ लाटांवर राज्य केले नाही तर कोट्यवधी भारतीयांचा विश्वासही जिंकला आहे. याच गौरवशाली प्रवासाचा उत्सव नुकताच रत्नागिरीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.
भारतीय तटरक्षक दलाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयसीजीएस रत्नागिरीतर्फे एका विशेष स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला रत्नागिरीचे मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि तटरक्षक वायू अवस्थानचे कमांडिंग ऑफिसर डीआयजी टी. एन. उपाध्याय यांच्यासह जिल्हयातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. नागरी प्रशासन आणि सागराचे रक्षक यांच्यातील समन्वय दृढ करणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. आत्मनिर्भरतेतून जागतिक दर्जाची भरारीवर यावेळी बोलताना स्टेशन कमांडर कमांडंट शैलेश गुप्ता यांनी तटरक्षक दलाच्या आधुनिक रुपांतराचा आढावा घेतला. आजमितीस हे दल १५५ जहाजे, ८० हवाई साधने आणि हॉवरक्राफ्टसह सज्ज आहे. ही सर्व यंत्रणा आत्मनिर्भर भारत संकल्पनेतून साकारली आहे. देशभरातील ४२ अवस्थाने आणि १६ जिल्हा मुख्यालयांच्या माध्यमातून हे दल २४ तास भारताच्या विस्तीर्ण सागरी किनार्यांचे रक्षण करत आहे.www.konkantoday.com




