
पश्चिम महाराष्ट्राला जोडणार्या कुंभार्ली घाटाच्या रस्त्याची अवस्था दयनीय
चिपळूण तालुक्यातून जाणारा कुंभार्ली घाट हा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा अतिशय -महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. या घाटातून दिवस-रात्र हजारो वाहनांची रहदारी सुरू असते. मात्र, सध्या या घाटातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे वाहन चालक व प्रवाशी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चिपळूण-कराड महामार्गावरील कुंभार्ली घाटात रस्त्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मार्ग काढताना अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागत आहे. विशेषत रात्रीच्या वेळी दाट धुक्यांमधून खड्डे नजरेस न पडल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढत आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी यांचा आरोप आहे की, अनेक वेळा हे खड्डे बुजविण्यात आले तरी काही दिवसांतच त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे निर्माण होतात. त्यामुळे करण्यात येणार्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कुंभार्ली घाटाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. चांगल्या दर्जाचे आणि टिकाऊ काम करूत्त नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.www.konkantoday.com




