कोकण रेल्वे पोलिसांचा ‘सुपर परफॉर्मन्स’; वर्षभरात 1.22 कोटींचे दागिने, सामान परत; 98 मुलांची सुखरूप सुटका


कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘रेल्वे सुरक्षा दल’ (RPF) ढाल बनून उभे असल्याचे २०२५ सालच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षभरात आरपीएफने राबवलेल्या विविध मोहिमांमुळे केवळ प्रवाशांचा चोरीला गेलेला मौल्यवान ऐवज परत मिळाला नाही, तर अनेक बालकांचे शोषण होण्यापासून संरक्षणही झाले आहे.प्रवासात घाईघाईत विसरलेले दागिने, लॅपटॉप किंवा बॅगा परत मिळवून देण्यासाठी आरपीएफने ‘ऑपरेशन अमानत’ प्रभावीपणे राबवले. या अंतर्गत २५२ प्रवाशांना त्यांचे १ कोटी २२ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सामान सुरक्षितपणे परत करण्यात आले.

दुसरीकडे, ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ द्वारे रेल्वे स्थानक किंवा गाड्यांमध्ये भरकटलेल्या ९८ अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली. या मुलांच्या पुनर्वसनासाठी संबंधित संस्थांची मदत घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले आहे.रेल्वे परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये ६,८७७ बेकायदा दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या असून ६५ तस्करांना जेरबंद केले आहे.

तसेच प्रवाशांच्या बॅगा चोरणाऱ्या ४० अट्टल चोरांना अटक करून त्यांच्याकडून ४८.६७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेतील चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत झाली आहे.केवळ गुन्हेगारी रोखणेच नव्हे, तर प्रवाशांचे प्राण वाचवण्यातही आरपीएफ जवान आघाडीवर राहिले. ‘ऑपरेशन जीवन रक्षा’ अंतर्गत, जवानांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता रेल्वे रुळावर किंवा प्लॅटफॉर्मवर अपघाताच्या छायेतील ४ प्रवाशांचे प्राण वाचवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button