
कोकणच्या लाल मातीत आता साहित्याचा एक नवा इतिहास लिहिला जाणार,मांडकी-पालवण येथे १३ फेब्रुवारीपासून ‘ग्रामीण, कृषी आणि सहकार साहित्य संमेलन’
कोकणच्या लाल मातीत आता साहित्याचा एक नवा इतिहास लिहिला जाणार असून चिपळूण मांडकी-पालवण येथे कोकणातील पहिल्यावहिल्या ‘ग्रामीण, कृषी आणि सहकार साहित्य संमेलनाचे’ भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन १३, १४ आणि १५ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्रालय पुरस्कृत आणि डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नेते आणि खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
राजकीय दिग्गजांसोबतच साहित्य क्षेत्रातील नामवंतांची मांदियाळीही या व्यासपीठावर पहायला मिळणार आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहतील. तीन दिवसांच्या या भरगच्च कार्यक्रमानंतर संमेलनाचा समारोप देखील तितकाच दिमाखदार होणार असून समारोप सत्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
प्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत सदानंदजी मोरे हे समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन करतील. एकाच साहित्य संमेलनाच्या निमित्ताने राज्यातील हे सर्व दिग्गज नेते आणि साहित्यिक चिपळूणमध्ये एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हे संमेलन चिपळूण तालुक्यातील मांडकी-पालवण येथील कृषी महाविद्यालयाच्या भव्य पटांगणावर पार पडणार असून या सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.




