
उमेद मोहिमेला जिल्ह्यात अभूतपूर्व यश, जिल्ह्यात बनल्या सव्वा लाख ’लखपती दीदी’
ग्रामीण भागातील महिलांना केवळ चूल आणि मुलांपुरते मर्यादित न ठेवता त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ’उमेद’ (राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान) मोहिमेला जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे. जिल्ह्याने प्रशासनाने दिलेले उद्दिष्ट ओलांडले असून, आतापर्यंत तब्बल १ लाख २५ हजार ८५६ महिला ’लखपती दीदी’ बनल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्याने सर्वाधिक लखपती दीदींची नोंद करत प्रथम क्रमांक पटकावला आहे
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकास साधणे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या १५ हजारांहून अधिक स्वयंसहाय्यता समूह कार्यरत आहेत. या समूहांमध्ये दीड लाखांहून अधिक महिला संघटित झाल्या असून, या माध्यमातून त्यांना स्वयंरोजगार आणि स्वावलंबनाचे नवे मार्ग खुले झाले आहेत.
प्रशासनाने सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यासाठी १ लाख १० हजार ३५९ महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, तसेच समुदाय संसाधन व्यक्तींच्या प्रभावी मार्गदर्शनामुळे हा आकडा १ लाख २५ हजार ८५६ वर पोहोचला आहे. आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीच्या जोरावर या महिलांनी स्वतःचे लघुउद्योग यशस्वीपणे उभे केले आहेत. या अभियानाचा लाभ घेण्यासाठी महिला ग्रामीण भागातील ’उमेद’ समूहाची सदस्य असणे आवश्यक आहे. या समूहाच्या माध्यमातून महिलांना विविध शासकीय योजना, बैंक कर्ज आणि तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. शाश्वत उत्पन्न मिळवून महिलांना समाजात एक मानाचे स्थान मिळवून देणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
www.konkantoday.com




