
आता आंबा-काजूला मिळणार कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सची साथ
कोकणातील पारंपरिक शेतीला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या महाऍग्रो-एआय धोरणांतर्गत (२०२५-२०२९) राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर करण्याचे निश्चित केले आहे. या धोरणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी रत्नागिरी जिल्ह्यासाठी असून, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात आता एक विशेष ’एआय इनक्युबेशन केंद्र’ उभारले जाणार आहे.
या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. कोकणचा विचार करता, इथली भौगोलिक परिस्थिती आणि पिकांची पद्धत वेगळी आहे. हाच धागा पकडून दापोली कृषि विद्यापीठात होणारे हे केंद्र कोकणातील आंबा, काजू, सुपारी आणि नारळ अशा महत्त्वाच्या बागायती पिकांवर लक्ष केंद्रित करेल. या केंद्रामुळे शेतीमध्ये केवळ मानवी श्रमावर अवलंबून न राहता रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांची पाहणी करणे सुलभ होणार आहे. उदाहरणार्थ, बागेतील कोणत्या झाडाला पाणी हवे आहे किंवा कोणत्या झाडावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे, याची अचूक माहिती हे तंत्रज्ञान देऊ शकेल.
www.konkantoday.com




