आंबा, काजू बागायतदार नुकसान भरपाई द्या-शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले


यावर्षी हापूस आंबा आणि काजूपिक धोक्यात आले असून, उत्पादन २० ते २५ टक्केच हाती येईल, अशी स्थिती आहे. त्यामुळे अर्धे उत्पादन खर्चही भरून काढता येणार नाही. या परिस्थितीमुळे आंबा आणि काजू बागायतदार आर्थिक कोंडीत अडकणार आहेत. त्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक नागले यांनी केली आहे.
बागायतदारांना मदत द्यावी, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्याकडे केली असल्याचे नागले यांनी सांगितले. यावर्षी हापूस आंबा-काजूसाठी हंगामाच्या सुरवातीपासून प्रतिकूल वातावरण आहे. लांबलेला व अवकाळी पाऊस, दाट धुके आदींमुळे आंब्याला आलेला मोहोर काळा पडून गळून गेला. मोहोर टिकून फळधारणा व्हावी यासाठी शेतकऱ्यांनी औषध फवारणीही केली; मात्र, त्यात मोहोर टिकून फळधारणा झाली नाही. तुडतुडा, बुरशीचा प्रादुर्भावही मोठ्या प्रमाणात होत आहे. या साऱ्यामध्ये आंबा हंगामासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला. त्या तुलनेमध्ये उत्पन्न मिळणे अशक्य आहे. सद्यःस्थितीमध्ये पंचवीस टक्केही उत्पादन मिळणे अशक्य आहे. काजूपिकाच्या उत्पादनाची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. झाडांवर लगडलेली फळे टिकावीत आणि थ्रीप्ससह तुडतुड्याच्या प्रादुर्भाव रोखला जावा म्हणून बागायतदार सातत्याने प्रतिबंधात्मक औषधांची फवारणी करत आहेत. हा खर्च उत्पादनातून कमी होईल की नाही, याबाबत साशंकता आहे. त्यासाठी बागायतदारांना शासनाकडून नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी तालुकाप्रमुख नागले यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button