
रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सोमवारी बंद
रत्नागिरी : नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्या आणि यंत्रणेच्या प्रतिबंधात्मक देखभाल-दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे पूर्ण रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा सोमवारी (१९ जानेवारी) बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आणि भविष्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी नगरपरिषदेकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक देखभाल केली जाते. याच मोहिमेअंतर्गत सोमवारी शहरातील मुख्य जलवाहिन्या आणि पंपिंग स्टेशनची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामामुळे पूर्ण दिवस शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित राहील.
रविवारपर्यंत आवश्यक तितका पाण्याचा साठा करून ठेवावा, उपलब्ध पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने आणि योग्य रीतीने करावा, दुरुस्तीनंतर मंगळवारी पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता असल्याने सहकार्य करावे, असे आवाहन नगर पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.



