
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा
गोरगरीबांसाठी आशेचा किरण ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२५ या वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल २२,५७५ केसेस दाखल झाल्या असून त्यापैकी १०,८३६ रुग्णांनी मोफत उपचारांचा प्रत्यक्ष लाभ घेतला आहे.
खासगी रुग्णालयांमधील महागडे उपचार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालय खर्चामुळे अडचणीत सापडणार्या गोरगरिबांना या योजनेमुळे मोठा दिलासा मिळाला. यापूर्वी किडनी प्रत्यारोपण, बायपास, किंवा इतर उच्चस्तरीय इलाजांसाठी लाखोंचा खर्च येत असे.
अनेकांना उपचार पुढे ढकलण्याची वेळ येत होती. मात्र राज्य सरकारने कर्करोग, हृदयरोग, अवयव प्रत्यारोपण यांसारख्या महागड्या आजारांचा समावेश योजनेत करून सामान्य रुग्णांना मोफत उपचाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनतून रुग्णांना ५ लाख रुपयांपर्यंत उपचार पूर्णपणे मोफत मिळतात. आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना यांच्या एकत्रित लाभामुळे कोल्हापूर, मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांतही रुग्ण उपचार घेऊ शकत आहेत. जिल्ह्यातील अनेक रुग्ण पूर्वी आर्थिक अडचणींमुळे मोठ्या शस्त्रक्रिया करू शकत नव्हते. मात्र आता आवश्यक कागदपत्रे रेशनकार्ड, आधारकार्ड, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला व फोटो ऑनलाईन सबमिट केल्यावर उपचार प्रक्रिया सुरू होते.www.konkantoday.com




