
पुण्याहून महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या एका 22 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी पैशांच्या वादातून ताम्हणी घाटात केली निर्घृण हत्या, आरोपी अटकेत
पुण्याहून महाबळेश्वरला सहलीसाठी निघालेल्या एका 22 वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी पैशांच्या वादातून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.ताम्हणी घाट परिसरातील सणसवाडी गावच्या हद्दीत ही घटना घडली असून, माणगाव पोलिसांनी अवघ्या 8 तासांत या हत्याकांडाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य गणेश भगत (वय २२, रा. भोसरी, पुणे) हा आपल्या अनिकेत वाघमारे, तुषार पोटोळे आणि प्रज्वल हंबीर या तीन मित्रांसह इनोव्हा क्रिस्टा कारने (MH12 XM 9448) महाबळेश्वरला फिरण्यासाठी निघाला होता. प्रवासादरम्यान, त्यांच्यामध्ये पैशांच्या व्यवहारावरून खडाजंगी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी धावत्या कारमध्येच दोरीने आदित्यचा गळा आवळला.त्यानंतर सणसवाडी गावच्या हद्दीतील ‘सिक्रेट पॉईंट’ जवळ आरोपींनी गाडी थांबवली. तेथे आदित्यला ओढत नेत कोयत्याने त्याच्या डोक्यावर, गळ्यावर आणि हातावर सपासप वार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह तिथेच टाकून आरोपी पसार झाले.११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:३० च्या सुमारास पोलिसांना सणसवाडी परिसरात एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला मृतकाची ओळख पटत नसल्याने हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र, रायगड पोलिसांनी तातडीने पुणे शहर आणि ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली.माणगाव पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास केला. तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी अवघ्या 6 ते 8 तासांत दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला




