तिकिट नाकारल्याने कुवारबांवमध्ये भाजपच्या ५७ पदाधिकार्‍यांचे राजीनामे


रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच सत्ताधारी महायुतीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणार्‍या कुवारबाव या पंचायत समिती गणात भाजपला तिकिट नाकारल्याने आणि नैसर्गिक युतीत अन्यायकारक वागणूक मिळाल्याच्या भावनेतून भाजपच्या तब्बल ५७ प्रमुख आणि सक्रीय पदाधिकार्‍यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत.
या घटनेमुळे रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. कुवारबाव पंचायत समिती गटावर भाजपचा दावा होता. मात्र महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली नाही किंवा अपेक्षित उमेदवाराला तिकिट नाकारण्यात आले. या गटातील एकूण ५८० सक्रीय कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांनी आपल्या पदांचे राजीनामे भाजपचे तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.
राजीनामा देताना नाराज कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आम्ही यापुढे भाजपच्या कोणत्याही संघटनात्मक कार्यात सहभागी होणार नाही. आम्ही पक्षाचे फक्त शुभचिंतक आणि मतदार म्हणून राहू असे जाहीर केले आहे. महायुतीतील अंतर्गत कलह आणि स्थानिक पातळीवर होणार्‍या अन्यायामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत युवा तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई यांनी स्पष्ट केले की, मी फक्त हे राजीनामे स्विकारत आहे. कार्यकर्त्यांच्या भावना आणि हे राजीनामे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे पाठवले जातील.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button