
कोकणात उद्योजकतेला मोठी संधी : शाळीग्राम खातू
“इच्छाशक्ती असेल, तर आपण अशक्य गोष्टी देखील साध्य करू शकतो. कोकणामध्ये देखील उद्योजकतेच्या संधी खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्या संधी आपण शोधल्या पाहिजेत. संकटे आणि आव्हाने ही कोणत्याही व्यवसायात असणारच आहेत; परंतु न डगमगता त्याला समर्थपणे सामोरे गेल्यास नक्कीच आपण त्यात यशस्वी होऊ शकतो,” असे मोलाचे मार्गदर्शन खातू मसाल्याचे सर्वेसर्वा आणि उद्योजक शाळीग्राम खातू यांनी विद्यार्थ्यांना केले.
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गातील विद्यार्थ्यांनी खातू मसाले उद्योगाला भेट दिली. त्यावेळी उद्योजक शाळीग्राम खातू आणि त्यांचे चिरंजीव सुरज खातू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
सुरुवातीला त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खातू मसाला कशाप्रकारे तयार होतो आणि त्याचे उत्पादन कसे चालते हे दाखवले आणि नंतर मार्गदर्शन करताना शाळीग्राम खातू यांनी खातू मसाला कशाप्रकारे सुरू झाला आणि त्याचा विकास कसा झाला याची माहिती दिली. व्यवसायातील विविध संकटे आणि आव्हाने कशी असतात आणि त्यावर कशी मात करावयाची याची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.
व्यवसायामध्ये देखील मोठ्या प्रमाणात स्पर्धा असते. स्पर्धा असल्याशिवाय आपली प्रगती देखील होत नाही हे त्यांनी आवश्यक विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले. त्यामुळे कोकणातील विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेची कास धरावी, असे आवाहन त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले.
यानंतर विद्यार्थ्यांनी देखील श्री. खातू यांना व्यवसायाविषयी विविध प्रश्नांची माहिती विचारली आणि त्याला योग्य अशी उत्तरे त्यांनी दिली. श्री. खातू यांना मागील वर्षी अमेरिकन विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिल्याबद्दल महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाचे वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष खोत, प्रा. कांचन कदम आणि सुभाष घडशी उपस्थित होते.




