
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या; गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांची मागणी
रत्नागिरी/:
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’ (EVM) ऐवजी बॅलेट पेपरवर (मतपत्रिका) घ्याव्यात, अशी आग्रही मागणी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी आपले मत मांडताना निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हतेवर भर दिला आहे.
ईव्हीएमच्या वापरासाठी अनेकदा ‘वेळेची बचत’ हे कारण दिले जाते. मात्र, उदय गोताड यांनी हा दावा खोडून काढला आहे. ते म्हणाले की, “जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे मतदारसंघ हे आकाराने आणि मतसंख्येने तुलनेने लहान असतात. त्यामुळे मतपत्रिकेवर मतदान झाले तरी मतमोजणीसाठी फारसा वेळ लागणार नाही. परिणामी, वेळेचे कारण पुढे करून ईव्हीएमचा आग्रह धरणे चुकीचे आहे.”
गेल्या काही काळापासून ईव्हीएम मशीनच्या विश्वासार्हतेवर विविध स्तरांतून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जनमानसात असलेला हा संशय दूर करण्यासाठी बॅलेट पेपर हाच उत्तम पर्याय असल्याचे गोताड यांनी नमूद केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर मतपत्रिकेवर झाल्या, तर मतदारांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक वृद्धिंगत होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.



