शिरगाव (रत्नागिरी) येथील दीपक सनगरे यांचे अकाली निधन

रत्नागिरी : सामाजिक व राजकीय क्षेत्रात सदैव सक्रिय सहभाग असलेले शहरानजीकच्या शिरगाव-तिवंडेवाडी येथील दीपक नारायण सनगरे (५०) यांचे शुक्रवारी पहाटे प्रकृती अस्वस्थतेमुळे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरी शहर व शिरगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
शिरगाव तिवंडेवाडी (रत्नागिरी) येथील रहिवासी असलेले दीपक सनगरे यांचे शालेय शिक्षण अ. के. देसाई हायस्कूलमध्ये झाले होते. सामाजिक आणि राजकीय कार्यात सदैव अग्रणी राहत शिवसेना शाखाप्रमुख म्हणूनही ते कार्यरत होते. संघटन कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक सार्वजनिक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे.
गेल्या काही वर्षांत दीपक यांच्यावर एकापाठोपाठ एक मोठे आघात झाले होते. काही महिन्यांच्या अंतराने त्यांनी आई आणि वडिलांना गमावले. हे धक्के पचवत असतानाच, त्यांच्या पत्नीचेही सुमारे पाच महिन्यांपूर्वी अचानक निधन झाले होते. शुक्रवारी पहाटे त्यांची तिवंडेवाडी येथील निवासस्थानी प्राणज्योत मालवली. शुक्रवारी दुपारी शिरगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी बहुसंख्येने ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार यांची उपस्थिती होती. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, भाऊ, बहिणी, भावजय असा मोठा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button