
शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मोठे आंदोलन उभे करू
बळीराज सेना पक्षप्रमुख अशोक वालम यांचा इशारा
“आपण स्वतः कसे मोठे व्हायचे हा विचार सगळे करत आहेत, मग शेतकरी मेला तरी चालेल. कोणाला काही पडलेली नाही? म्हणूनच बळीराज सेनेच्या सर्व नेत्यांनी पूर्ण कोकणचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांशी संपर्क साधून कशा पद्धतीने नुकसान झाले आहे, किती नुकसान झाले आहे. याची माहिती आम्ही घेत आहोत. या माहितीच्या आधारे पुढील आठवड्यात आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असून, कोकणला न्याय देणार कोण, कोकणच्या शेतकऱ्यांना न्याय देणार कोण असे प्रश्न उपस्थित करणार आहोत. तरीही दखल घेतली नाही ,तर मात्र शेतकऱ्यांसाठी बळीराजा सेनेच्या वतीने मोठे आंदोलन उभे करू”, असा गंभीर इशारा बळीराज सेनेचे पक्षप्रमुख अशोक (दादा) वालम यांनी शासनाला दिला आहे.
५ नोव्हेंबर रोजी ते गुहागर दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. वालम म्हणाले की, “सध्या कोकणात पडतोय तो अवकाळी पाऊस नसून हा वाढीव पाऊस आहे. पाच महिने सतत तो पडतोय आणि पावसाने कोकणातील असलेली भात शेती असेल नाचणी, वरी यांच्यासह इतर पिकेही उद्ध्वस्त झाली आहेत. हवामान खात्याने पावसाचा अंदाज डिसेंबरपर्यंत दिल्याने आंबा, काजू हे पीक सुद्धा पूर्ण नष्ट होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. आजपर्यंत कोकणातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही. पण याच्या नंतर जर शासनाने लक्ष दिला नाही तर मात्र शेतकऱ्यांवर नक्की आत्महत्या करण्याची परिस्थिती कोकणात निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी इथले राजकारणीच जबाबदार आहेत.”
वालम पुढे म्हणाले की, “आज पश्चिम महाराष्ट्र असू दे, विदर्भ-मराठवाडा असू दे, तिकडच्या शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू असतील किंवा अनेक इतर पुढारी ते आंदोलन उभे करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला, तर आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांना त्याचा काही फायदा होणार नाही. इकडच्या लोकप्रतिनिधींनी मग ते आमदार, खासदार, पालकमंत्री असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे होती. त्यांनी स्वतःहून यासाठी नियोजन केले पाहिजे होते. पण कोण करत नाही?”, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यावेळी वालम यांच्यासोबत बळीराज सेनेचे जिल्हा प्रमुख पराग कांबळे, सरचिटणीस संभाजी काजरेकर, शामराव पेजे महामंडळ अध्यक्ष डॉ. प्रकाश भांगरथ, विधानसभा संपर्क प्रमुख शरद बोबले, सह संपर्कप्रमुख मनोहर घुमे, अमित काताळे, तालुकाध्यक्ष अरुण भुवड, महिला आघाडी अध्यक्ष श्रावणी शिंदे, विधानसभा महिला आघाडी प्रमुख ऐश्वर्या कातकर, सचिव स्वप्नाली डावल, तालुका सचिव श्वेतांबरी मोहिते, लोटे विभाग प्रमुख सुभाष हुमणे, तालुका उपाध्यक्ष संतोष पाष्टे, युवक अध्यक्ष विवेक जांगली, तृप्ती शिगवण, गजानन मांडवकर, विनायक घाणेकर, नामदेव अवरे यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.




