कर्जमाफीचा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना, बळीराजाला ताकद देणे आहे : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : “महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी, बळीराजांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. बळीराजाला ताकद म्हणजे आपण ज्याच्या जीवावर दोन वेळेच जेवतो, त्याला ताकद देणं म्हणजे महाराष्ट्राला ताकद देणे आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ताकद देण्यासारखे आहे आणि ती संस्कृती आज महायुतीच्या सरकारने जोपासली आहे,” अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी येथे मांडली.
येथील शासकीय विश्रामगृहात आज (३१ ऑक्टोबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, “ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये सततचा पाऊस पडतोय. अवकाळी पाऊस पडतोय. या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती की कर्जमाफी झाली पाहिजे, ती कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण ही कर्जमाफी करत असताना अजून एक महत्त्वाची गोष्ट जी मला सांगायची आहे की, ज्यावेळी विधानसभेच्या अगोदर आम्ही सरकारमध्ये होतो आणि लोकसभेनंतर आम्ही विधानसभेला सामोरे गेलो त्यावेळी वचननामा तयार केलेला होता. वचननामा तयार करत असताना त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस होते. या वचननाम्यात आम्ही शेतकऱ्यांवर पावसामुळे असेल, दुष्काळामुळे असेल जे काही संकट येतात त्या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही कर्जमाफी करू, ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली होती आणि आज मला सांगताना समाधान आहे की, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द निवडणुकीच्या निमित्ताने दिला होता तो आज मुख्यमंत्र्यांनी बळीराजासाठी पूर्ण केला हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.”

जी कर्जमाफीची तारीख दिलेली आहे त्या तारखेपर्यंत कर्जमाफी नक्की होईल. दुष्काळ परिस्थितीतून बाहेर पडण्याची ताकद ही महाराष्ट्रातल्या बळीराजाला मिळणार असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे रत्नागिरीमध्ये कापलेल्या भाताचे नुकसान झाले आहे. शेतात असलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे, त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी कोकण आयुक्तांना दिलेल्या आहेत. माझे देखील बोलणे जिल्हाधिकाऱ्यांशी झाले आहे. हे सगळे पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. पुढील चार-पाच दिवसांमध्ये हे पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल, असे पालकमंत्री सामंत यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button