
जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबरघरोघरी येणाऱ्या आरोग्य पथकास प्रतिसाद द्यावा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
रत्नागिरी, दि. १७ ) : आजपासून २ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. याबाबत लोकांमध्ये जनजागृती करावी. आरोग्य पथक घरोघरी जावून सर्वेक्षण करणार आहे. त्यांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
‘कुष्ठरोग शोध मोहीम २०२५ जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) चे वैद्यकीय अधिकारी डॉ. परवेझ पटेल, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी एन. जी. बेंडकुळे आदी उपस्थित होते.
डॉ. आठल्ये आणि डॉ. पटेल यांनी संगणकीय सादरीकरण करुन मोहिमेबाबत माहिती दिली.
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, या मोहिमेची जनजागृती करा. जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात “शून्य कुष्ठरोग प्रसार” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग काम करीत आहे. जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करा. या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी. काही संशयास्पद लक्षणे वाटल्यास जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय याठिकाणी संपर्क करावा. संशयित रुग्णांना चांगला उपचार देवू शकू, असेही ते म्हणाले.
या पंधरवड्यात आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक घरोघरी जाऊन कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करणार आहेत. यासाठी 1 हजार 153 शोध पथके तयार करण्यात आली आहेत. 236 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रत्येक पथकात एक आशा व एक पुरुष स्वयंसेवक असणार आहे.
जिल्ह्यातील जोखीमग्रस्त व दुर्लक्षित भागांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कुष्ठरोग लक्षणांची ओळख व वेळेवर उपचार देणे, प्रसार रोखणे व सामाजिक भेदभाव दूर करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.
कुष्ठरोगाची लक्षणे
त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे.
त्वचा जाड, तेलकट किंवा गाठीदार होणे.
कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे.
डोळे पूर्णपणे बंद करता न येणे.
तळहात व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा किंवा जखमा होणे.
हात व पायाची बोटे वाकडी होणे, मनगटापासून लुळे पडणे.
थंड-गरम संवेदना न जाणवणे.
हातातून वस्तू गळून पडणे, चालताना चप्पल गळून पडणे.
अभियाना दरम्यान शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध स्पर्धा, तसेच कुष्ठरोगाची चिन्हे, लक्षणे, मोफत उपचार आणि समज-गैरसमज याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. गावपातळीवर दवंडी देऊन सर्व ग्रामस्थांना अभियानाची माहिती देण्यात येणार आहे.




