
कुवारबावची वाहतूक कोंडी संपणार, कुवारबावच्या उड्डाणपुलाला केंद्र सरकारची मंजुरी
मिर्या-नागपूर महामागास दभात रत्नागिरीकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट मिळाली आहे. रत्नागिरी शहरातून हातखंबा येथे जाताना वाहतूक कोंडीचा मुख्य पॉईंट ठरलेल्या कुवारबाव येथे तब्बल ९० कोटी रुपयांच्या उड्डाणपुलाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
रत्नागिरी शहरातून हातखंबा येथे जाताना कुवारबाव जंक्शनवर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे महामार्गाच्या कामात या ठिकाणी केवळ रस्ता रुंदीकरण होणार की वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा म्हणून उड्डाणपूल होणार, याकडे
संपूर्ण रत्नागिरीकरांचे लक्ष लागले होते. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी पालकमंत्री सामंत यांनी गडकरींकडे पाठपुरावा केला आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळे ९० कोटींच्या या उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महत्त्वाकांक्षी पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून, येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे.
सध्या सुरू असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी वाहतुकीवर ताण येत आहे. अशा परिस्थितीत कुवारबाव येथील हा नवीन उड्डाणपूल भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अत्यंत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
www.konkantoday.com




